
कुडाळ (प्रतिनिधी) “महाराष्ट्रातील फक्त २५ टक्के जनतेच्या समर्थन असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालात म्हणजे तुम्ही देशाचे किंवा अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष नाही. एक संस्कृत जावळीकर म्हणून आम्ही शुभेच्छा देतो, पण तुम्ही जावळी तालुक्याच्या विकासाच्या आणि जनतेच्या प्रगतीच्या आड आलात तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही कमजोर नाही,” असा थेट इशारा वसंतराव मानकुमरे शशिकांत शिंदे यांचे नाव घेऊन दिला आहे . थेट जावळीच्या राजकारणात ढवळाढवळ कराल तर जशास तसे उत्तर देऊ असा देखील इशारा देण्यात आला आहे
जावळी तालुक्यातील कोलेवाडी गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले, माथाडी कामगार म्हणून कार्याला सुरुवात करून ठाणे-मुंबई परिसरात आपल्या स्वकर्तृत्वाने कायदेशीर व्यवसायात नेत्रदीपक प्रगती करणारे उद्योजक दत्तात्रय भालेकर यांच्या यशाला काही स्वार्थी आणि भ्रष्ट नेत्यांची वक्रदृष्टी लागली आहे. त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीवर चौकशीची मागणी करून एका उदयोन्मुख उद्योजकाच्या पायात खोडा घालण्याचा प्रयत्न काही अपवृत्तींकडून सुरू असल्याचा आरोप वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे यांनी केला आहे.
या अन्यायाविरोधात ४ ऑगस्ट रोजी पाचवड-करहर मार्गे मेढा येथे मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तालुक्याचे आमदार व राज्याचे मंत्री मा.ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सल्ल्यामुळे हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. “गाई मारली म्हणून वासरू मारू नये” असा मोलाचा सल्ला देत राजेसाहेबांनी तालुक्यात तणाव वाढू नये, अशी सूचना केली.
वसंतराव मानकुमरे म्हणाले, “आम्ही राजेसाहेबांचा आदेश मानून मोर्चा स्थगित केला, पण याचा अर्थ आम्ही भीतीपोटी मागे हटलो असा होत नाही. पोलिसांनी परवानगी दिली किंवा नाकारली, रस्त्यावर संघर्ष करण्याची हिंमत आमच्यात आहे. अनेकदा विना परवानगी आंदोलन केले आहे. परिणामाची चिंता आम्हाला यापूर्वी कधीच नव्हती आणि आम्ही केली देखील नाही त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्याबरोबरचा संघर्ष आमच्यासाठी नवा नाही आमचा राजकारण संघर्षात आहे त्यामुळे जावळी तालुक्यात इथून पुढे ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही. गल्ली ते दिल्ली आमचीच सत्ता आहे. मोर्चा काढण्यासाठी आम्हाला कोणीही रोखू शकत नाही आणि रोखलं तरी त्याला आम्ही जुमानत नाही मात्र , कायदा हातात घेऊन आमचे नेते अडचणीत येऊ नयेत म्हणून आम्ही पाऊल मागे घेतले.” आणि नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनांचा आदर करत तालुक्यातील वातावरण बिघडू नये म्हणून सलोखा आणि तालुक्याच्या जनतेचा विचार करून आम्ही राजकारण आणि समाजकारण करणारी आहोत असे देखील वसंतराव यांनी सांगितले