
🛑 “पाऊस आला मोठा… विकास झाला खोटा!”
📍 महाबळेश्वर | प्रतिनिधी – सादिक सय्यद
सातारा जिल्ह्यातील दुर्गम महाबळेश्वर तालुक्यातल्या विकासकामांच्या ‘गुणवत्तेचा मुखवटा’ पहिल्याच पावसात उतरला! तापोळा–महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर चिखली गावाच्या हद्दीत नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण भागात संतापाची लाट पसरली असून, “पाऊस आला मोठा… पण विकास मात्र खोटा!” अशी टिका स्थानिकांकडून होऊ लागली आहे.
🔍 शिंदेंचं स्वप्न, पण काम निकृष्ट!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात दळणवळणाच्या सोयीसाठी जाळं उभारण्याचं मोठं स्वप्न साकार करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी कोट्यवधींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात आला.
महाबळेश्वर–तापोळा रस्ता हा तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र, याच रस्त्याचं बांधकाम निकृष्ट पद्धतीने झालं असल्याचं आता पहिल्याच पावसात समोर आलं आहे.
❗ सरकारचा निधी… पण दर्जा कुठे?
- रस्त्याचं काम अगदी अलीकडेच झालं असूनही, मुसळधार पावसात तो पूर्णतः उखडून गेला.
- ठेकेदाराच्या निष्काळजी कारभारामुळे रस्त्याचं बांधकाम पावसाला तोंड देऊ शकलं नाही.
- सार्वजनिक बांधकाम विभागाची गुणवत्ता तपासणी आणि देखरेख अपुरी असल्याचे आरोप होत आहेत.
🗣️ स्थानिकांचा रोष – “काम नव्हे, हिशोब मांडला!”
“काम चालू करताना एवढा गाजावाजा झाला, पण आता कोणीही जबाबदारी घेत नाही!“
“ठेकेदार म्हणजेच कार्यकर्ता, मग कारवाई कोणावर होणार?“
“विकासाच्या नावाखाली डोळ्यांत धूळफेक सुरू आहे, गावाचं नुकसान कुणी भरून देणार?“
– असे सवाल गावकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत.

⚠️ मुख्यमंत्र्यांचे आदेश हवेत?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकृष्ट दर्जाच्या विकासकामांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात महाबळेश्वरसारख्या भागात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
“ठेकेदाराला वाचवणाऱ्या यंत्रणेवर लगाम नाही, तोपर्यंत गुणवत्तेचा गाळच वाहत राहणार!”
– शाश्वत विकासासाठी ‘दृढ इच्छाशक्ती’ हवी!
दुर्गम भागात विकासकामांची गरज नाकारता येणार नाही. पण जर कामं निकृष्ट, निष्काळजी आणि अपारदर्शक पद्धतीनं केली जात असतील, तर त्या विकासाचं स्वरूप हे थैलीशहांचं हितसंपन्न जाळं ठरेल.
महाबळेश्वर–तापोळा रस्त्याची ही दुर्घटना केवळ रस्त्याची नाही, तर निष्काळजी नियोजन, ठेकेदार–प्रशासन संगनमत आणि अपयशी कार्यपद्धतीचं प्रतीक आहे.