साताऱ्यातून भीम भक्तांचा मुंबईच्या दिशेने जन आक्रोश मोर्चा
“या देशाला संविधान देणारे, सामाजिक न्यायाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी जपण्यासाठी भीम अनुयायांचा सातारातुन थेट मुंबईपर्यंतचा लांबचा पायी प्रवास आज सुरू झाला आहे. सरकारकडून अनेक वर्षांपासून आश्वासनं मिळाल्यानंतरही, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन उभारण्यात आलं आहे आरपीआय आठवले गट पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड स्वप्निल गायकवाड यासह सातारा जिल्ह्यातील आरपीआयचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भीम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पडत्या पावसातही हातात बाबासाहेबांचे फलक, मुखात जयभीमच्या घोषणा आणि डोळ्यात फक्त एकच ध्यास — बाबासाहेबांच्या स्मृतींना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा! साताऱ्यातील हजारो भीम अनुयायींनी आज थेट सातारा ते मुंबई असा पायी प्रवास सुरू केला आहे.
या आंदोलनामागे तीन महत्त्वाच्या मागण्या आहेत –
- साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल — जिथे बाबासाहेबांनी शिक्षणाची पहिली पायरी चढली, त्या शाळेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा.
- साताऱ्यातील आमले बंगला — जिथे बाबासाहेब राहिले, त्या वास्तूला स्मारकाचा दर्जा आणि जतन करण्यासाठी संपूर्ण निधी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हावी.
- साताऱ्यातील रखडलेले भीमाई स्मारक — जे वर्षानुवर्षं घोषणांमध्ये अडकलेलं आहे, त्याचे पुनर्जीवन आणि दर्जात्मक उभारणी व्हावी.
या मागण्यांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे, अखेर “आश्वासनं नको, अंमलबजावणी हवी!” असा आवाज घेऊन ही पायपीट सुरू झाली आहे
“साताऱ्यातून निघालेला हा जनअक्रोश मोर्चा आता मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. रस्त्यावर घोषणाबाजी, पोलिसांचा बंदोबस्त आणि जनतेच्या मनात खदखदणारा संताप — याचे साक्षीदार आपल्याला येत्या काही तासांत ठिकठिकाणी मिळणार आहेत. हा लढा केवळ बाबासाहेबांच्या स्मृतीसाठी नाही, तर इतिहास आणि संस्कृतीच्या सन्मानासाठी आहे…