
नेतृत्वाची जीवंत मूर्ती – राजेंद्र शेठ राजपुरे यांचा प्रेरणादायी प्रवास”वाढदिवस विशेष
इम्तियाज मुजावर यांच्या लेखणीतून
समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देणं, प्रत्येक गरजवंताच्या मागे न ठरवता खंबीरपणे उभं राहणं, आणि लोकहितासाठी कोणताही त्याग पत्करणं – ही केवळ गोंडस वाक्यं नव्हेत, तर ती एक जीवनशैली आहे जी राजेंद्र शेठ राजपुरे यांच्याशी समरस झाली आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या जनतेच्या मनावर गारुड गाजवणारे आणि विश्वासाचं दुसरं नाव बनलेले हे नेते, आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत, आणि हीच एक संधी आहे त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्याची!
तीन आघाड्यांवर समांतर झुंज
राजकारण, समाजकारण आणि सहकार – या तीनही क्षेत्रात राजेंद्र शेठांनी आपल्या कार्याची ठसठशीत छाप सोडली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावे विकासाच्या वाटेवर पुढे सरकली. कोणताही निर्णय घेताना शेठांचं जमिनीवरचं ज्ञान, जनतेशी थेट संवाद आणि सत्य परिस्थितीची जाण – ही त्यांची खास वैशिष्ट्यं मानली जातात.

संघर्षातून नेतृत्वाकडे प्रवास
त्यांचा झंझावाती प्रवास सुरू झाला पाचगणी विकास सेवा सोसायटी येथून, जिथून त्यांनी सहकार क्षेत्रात पाऊल टाकलं. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यासाठी उपाययोजना राबवणं, पतसंस्था आणि बँकांमधून जनतेला आर्थिक पाठबळ मिळवून देणं, या बाबतीत शेठांनी आपली कार्यक्षमता सतत सिद्ध केली आहे.
दत्तात्रय कळंबे महाराज बिगरशेती पतसंस्था आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी मिळवलेलं नेतृत्व हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. सामान्य गावकरी असतानाही, आमदार-खासदार संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांची निवड होणं हे त्यांच्या कर्तृत्वाचं प्रतिक आहे.
पदापेक्षा समाज मोठा!
शेठ यांचा एक मोठा गुण म्हणजे – ‘पदापेक्षा समाज महत्त्वाचा’ ही भूमिका ते कृतीतून दाखवतात. नागेवाडी धरणातून कराळ गावात पाणी पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी प्रत्यक्ष विहीर बांधून पूर्ण केला. केवळ निधी आणून सोपवण्याऐवजी, प्रत्यक्ष गावोगावी जाऊन अडचणी समजून घेणं आणि त्यांच्या मुळाशी जाऊन उपाय करणं ही शेठांची कार्यशैली आहे.
महिलांसाठीही नेतृत्वाचा आदर्श
महिला सक्षमीकरणाचं उदाहरण त्यांनी त्यांच्या पत्नी रुपालिताई राजपुरे यांचं पंचायत समितीवर यशस्वी नेतृत्व उभं करून दिलं. महिलांना राजकारणात केवळ संख्यात्मक नव्हे, तर गुणवत्तेचा वाव मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमी पुढे असतात.
युवा नेतृत्व घडवणारा नेता
वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान आणि राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंच या माध्यमातून त्यांनी तरुणांना सामाजिक परिवर्तनासाठी व्यासपीठ दिलं आहे. त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांची जी एकजुटीची आणि सक्रिय फळी उभी आहे, ती त्यांच्या स्वभावातील नम्रता, कामातील पारदर्शकता आणि संपर्कातील सातत्य यामुळेच.
जनतेसोबतच चालणारा नेता
शेठ हे केवळ उत्सवात नाही, तर संकटातही लोकांसोबत दिसतात. गावागावात फिरणं, प्रत्येक फोन कॉलला उत्तर देणं, गरजूंना तातडीने मदत करणं हे त्यांच्या दैनंदिन कामाचाच भाग आहे.
राजकीय पोकळीतील आश्वासक भर
स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने महाबळेश्वर तालुक्यात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी, राजेंद्र शेठांच्या व्यक्तिमत्त्वामुळे भरून निघाली आहे, असं तालुक्याच्या जनतेचं ठाम मत आहे. त्यांच्या संयमी व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे तालुक्याला विकासाची नवी दिशा मिळाली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचं कार्यही शेठ यांनी खांद्यावर घेतलं असून, तालुक्यातील समन्वय, शांतता व एकात्मतेसाठी त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
“नेतृत्व ही केवळ खुर्ची नव्हे, ती जबाबदारी आहे” हे वाक्य राजेंद्र शेठ राजपुरे यांचं आयुष्य साक्षात सादर करतं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अधिक सामर्थ्य आणि यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!