साताऱ्यात १० ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान जागतिक मराठी संमेलन आयोजितखा. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, डॉ. आ. ह. साळुंखे अध्यक्षपदी

साताऱ्यात १० ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान जागतिक मराठी संमेलन आयोजित
खा. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, डॉ. आ. ह. साळुंखे अध्यक्षपदी

सातारा : रयत शिक्षण संस्था सातारा आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन समारंभ १० जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.

जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत या संमेलनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

रामदास फुटाणे यांनी सांगितले की, “१९८९ मध्ये जागतिक मराठी परिषद या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचा मुख्य उद्देश जागतिक पातळीवर मराठी भाषिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा आणि संस्कृतीची जपणूक करणे आणि विविध क्षेत्रांमध्ये मराठी माणसाची प्रगती साधण्यासाठी त्याला प्रेरित करणे आहे. ‘शोध मराठी मनाचा २०२५’ या सूत्रावर आधारित २० वे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.”

या संमेलनात अंदाजे तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी, महाराष्ट्राच्या विविध भागांतून अभ्यासक, नागरिक सहभागी होणार आहेत. उद्घाटन समारंभात खा. शरद पवार आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या उपस्थितीत विशेष पुरस्कार वितरण समारंभही आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी जिल्ह्याचे सुपुत्र आणि बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांना ‘जागतिक मराठी भूषण २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाईल. तसेच, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांना ‘विवा चॅरिटेबल ट्रस्ट’ पुरस्कृत ‘जागतिक मराठी गौरव पुरस्कार’ २५,००० रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात येईल.

या तीन दिवसीय जागतिक मराठी संमेलनात विविध क्षेत्रातील तज्ञ व विचारवंत विद्यार्थ्यांना उद्योग, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नवनवीन संधींबाबत मार्गदर्शन करतील. संमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्य घडवण्यासाठी उत्तम संधी मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

रामदास फुटाणे व चंद्रकांत दळवी यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना संमेलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी संमेलनाचे सचिव विकास देशमुख, डॉ. शिवलिंग मेनकुदळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!