सत्संगात व्यासंगी उल्हासदादांचा झालेला सन्मान आनंददायी : खा. श्रीनिवास पाटील

सत्संगात व्यासंगी उल्हासदादांचा झालेला सन्मान आनंददायी : खा. श्रीनिवास पाटील

भुईंज येथे शानदार सोहळ्यात उल्हास पवार यांना मानपत्र प्रदान

भुईंंज : कृष्णा नदीकाठी भक्ती आणि शक्तीचा संगम असणारं पवित्र ठिकाणी सुरु असणार्‍या पारायण सोहळ्यासारख्या सत्संगात उल्हासदादा पवार या मित्राचा मानपत्र देवून झालेला सन्मान हा अत्यंत आनंददायी आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेची पताका उंचावताना त्या ठिकाणी विचारांची पताका उंचावणार्‍या व्यक्‍तिंचा गौरव ही अत्यंत महत्वाची बाब आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी भुईंज येथे बोलताना केले.
येथील ज्ञानेश्‍वरी पारायण मंडळाच्या वतीने सुरु असणार्‍या ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात झालेल्या अत्यंत देखण्या आणि शानदार सोहळ्यात पारायण मंडळ व भुईंज प्रेस क्‍लबच्या वतीने वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार उल्हासदादा पवार यांचा मानपत्र, वारकरी उपरणे, पुष्पहार प्रदान करुन व मानाचा फेटा बांधून खा. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले, पोपट महाराज स्वामी, भरतनाना क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा. पाटील यांनी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेसोबत कला, लोककला, साहित्य परंपरेचा आढावा घेत त्यातील उल्हासदादा पवार यांच्या योगदानाचा गौरवास्पद उल्लेख केला. उल्हासदादा पवार म्हणाले, या ठिकाणी अनेकदा येवून गेलो. इथल्या भावपूर्ण वातावरणात झालेला हा सन्मान भावनारा आहे. पारायण सोहळे हे विचारांचे केंद्रं असून अशा ठिकाणाहून महाराष्ट्राच्या सर्वसमावेश परंपरेचा उद्घोष होतो. सध्याचे सार्वजनिक वातावरण गढूळ केले जात असले तरी सामान्य माणसाच्या शक्तीच्या बळावर ते निर्मळ होईल. मदनदादा भोसले म्हणाले, पारायण सोहळ्याच्या माध्यमातून सलग 18 वर्ष सुरु असणारी व्याख्यानमाला ही महत्वपूर्ण बाब आहे. सलग एवढी वर्ष असा हा उपक्रम चालवणे कौतुकास्पद असून त्या उपक्रमात उल्हासदादांचा होत असलेला सत्कार समाधान देणारा आहे.
या सोहळ्यात प्रा. मिलिंद स्वामी, अर्चना स्वामी, विनायक खरे, प्रा. डॉ. दिपिका माने सूर्यवंशी, सुनिल शेवते, रणजित भोसले पाटील, रोहित पाटील, सुजय शेवते, रोहित कदम, किरण धुरगुडे, अमित सूर्यवंशी, विजया एरंडे या कर्तबगारांचा सन्मान खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी पोपट महाराज स्वामी व भरतनाना क्षिरसागर यांनी आशिर्वादपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मोहनराव भोसले, विठ्ठलराव जाधवराव, राजेंद्र शेलार, अ‍ॅड. प्रतापसिंह देशमुख, सतिश भोसले, पै. मधुकर शिंदे, पै. जयवंत पवार, सरपंच विजय वेळे, उपसरपंच शुभम पवार, पं. स. माजी सदस्या सुशिला शेवते, नारायणपूरचे सरपंच रामभाउ बोरकर, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, ग्रा. पं. सदस्य अमित लोखंडे, यशराव भोसले, अशोक जाधवराव, अतुल भोसले, कृष्णात घाडगे, विनोद भोसले, जितेंद्र वारागडे, विक्रम केसरकर विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
रामदासबापू जाधव, जगन्नाथ दगडे, आशिष भोसले पाटील यांनी स्वागत केले. भैय्यासाहेब जाधवराव यांनी प्रास्ताविक केले. महेंद्रआबा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत पिसाळ यांनी आभार मानले.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
कृष्णेकाठी वक्‍तृत्वाचा त्रिवेणी संगम

कृष्णा नदीकाठी भृगुऋषी मठावर पार पडलेल्या या सोहळ्यात खा. श्रीनिवास पाटील व उल्हासदादा पवार या मित्रांनी आपल्या अमोघ वाणीने परस्परांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे पदर अलवारपणे उलगडत व्यक्‍त केलेल्या मनोगताने वातावरण मंत्रमुग्ध करुन टाकले. या दोघांच्याही मनोगतावेळी उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. या दोघांसोबत मदनदादा भोसले यांच्यारुपाने वक्तृत्वाचा त्रिवेणी संगम कृष्णेकाठी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्‍त केली. यावेळी पत्रकार राहुल तांबोळी यांनी लिहलेल्या मानपत्राचाही सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात गौरवास्पद उल्लेख केला.
. . . . . . . . . . . . . .

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!