“वनराईला नवा श्वास! पाचवड-रत्नागिरी मार्गावर झाडांचे पुनर्जन्म…!”
कुडाळ( प्रतिनिधी )सातारा जिल्ह्यातून निसर्गरक्षणाचा नवा अध्याय… रस्ता रुंदीकरणात नष्ट होणाऱ्या झाडांना मिळाले नवे जीवन!
पाचवड ते थेट कोकणातील रत्नागिरीला जोडणाऱ्या राज्य मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. या कामांदरम्यान शेकडो जुनी झाडे, वनराईच्या रेषा नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. मात्र या निसर्गहानीवर एक सकारात्मक आणि हिरवा उपाय साकारण्यात आला आहे…
देसाई इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या पुढाकाराने तब्बल 120 हून अधिक झाडांचे ‘रिप्लांटेशन’ – म्हणजेच मूळासकट दुसरीकडे पुनर्लागवड – करण्यात आली आहे.
इतकंच नव्हे, तर हा मार्ग हिरवा राहावा यासाठी पाचवडपासून रत्नागिरीपर्यंतच्या महामार्गावर 5000 झाडे नव्याने लावण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.
यामध्ये 15 फूटांपर्यंत उंच असलेल्या वेगवेगळ्या जातींच्या झाडांचा समावेश आहे.
विशेषतः पाचवड ते मेढा, बामनोळी ते रघुवीर घाट आणि पुढे रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावर ही झाडे वनराई टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लावली जात आहेत.
या संपूर्ण उपक्रमात समाजाचा सहभागही महत्त्वाचा ठरतो आहे.
झाडांचे पुढील पाच वर्ष संगोपनाची जबाबदारी देखील बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आवाहनावरून देसाई ग्रुपने उचलली आहे.
निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी ही एक आश्वासक बातमी आहे. रस्ते रुंद होतील, पण वनराईचं संरक्षणही साधलं जाईल – हीच खरी विकास आणि निसर्गसंतुलनाची दिशा आहे.