जावळी तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर: कुडाळ येथील टोमॅटो पिकाला जबर फटका, रवींद्र शिंदे यांचे पाच लाखांचे नुकसान!

जावळी तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर: कुडाळ येथील टोमॅटो पिकाला जबर फटका, रवींद्र शिंदे यांचे पाच लाखांचे नुकसान!

पाचगणी प्रतिनिधी इम्तियाज मुजावर – सातारा जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. जावळी तालुक्यातील कुडाळ गावातील शेतकरी रवींद्र शिंदे यांच्या एक एकर क्षेत्रावर लावलेल्या टोमॅटो पिकाचे तब्बल चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोमॅटोचे हे नुकसान शिंदे कुटुंबियांसाठी मोठा आर्थिक झटका ठरला आहे.

रवींद्र शिंदे यांनी टोमॅटो लागवडीसाठी दीड लाख रुपये प्रति एकर इतका खर्च केला होता. सध्या बाजारात टोमॅटोला चांगला दर आणि मागणी असताना, हे पीक अक्षरशः पावसाच्या तडाख्यात वाहून गेले. परिणामी शेतकऱ्याच्या आशा, मेहनत आणि गुंतवणूक वाया गेली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून रब्बी हंगामासाठी शेती उपयोगात येईल की नाही, याचीही शंका निर्माण झाली आहे.

तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून माती वाहून जाणे, तालबंध फुटणे अशा घटनांमुळे शेतीचा पाया हादरला आहे. मागील अनेक नैसर्गिक आपत्तींप्रमाणे यंदाही नुकसान भरपाई मिळणार का याविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिले असले तरी महसूल यंत्रणा अजूनही कामाला लागलेली नाही.

शेतकऱ्यांच्या बांधावर तलाठी, सर्कल, ग्रामसेवक गेलेले नाहीत, ही वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांना शासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. “नेहमीच येतो पावसाळा, नेहमीच होते नुकसान” या उक्तीप्रमाणे शेतकरी आता स्वतःच्या जोरावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

रवींद्र शिंदे यांनी पुन्हा एकदा नव्या उमेदीनं पुढील हंगामाची तयारी सुरू केली असली, तरी शासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिंदेसह इतर शेतकरी करत आहेत. अन्यथा बळीराजाची ही घालमेल अधिकच तीव्र होईल, हे नक्की.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!