
जावली तालुक्यात सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत – २५ एप्रिलला राजकारणाचा ‘सुपर शुक्रवार’!
सातारा : येत्या २५ एप्रिल रोजी जावली तालुक्यातील ग्रामराजकारणाला नवे वळण देणारी अत्यंत महत्त्वाची घडामोड घडणार आहे. २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळासाठी १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत मेढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
राजकीय वर्तुळात याला ‘सुपर शुक्रवार’ म्हणून पाहिले जात आहे. अनेक गावांमध्ये सरपंचपदासाठी इच्छुकांची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. काही ठिकाणी अगोदरच गट बांधणी, रणनीती आखणी, तर काही ठिकाणी विरोधकांना चकवा देण्यासाठी ‘संपर्क मोहीम’ सुरू आहे. त्यामुळे आरक्षणाचा फटका कोणाला बसणार आणि संधी कोणाच्या वाट्याला येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आरक्षणाचा तपशील असा :
- अनुसूचित जाती – महिला : ५, खुलं : ४
- अनुसूचित जमाती – महिला : १, खुलं : १
- इमव (OBC) – महिला : १७, खुलं : १६
- सर्वसाधारण – महिला : ४१, खुलं : ४०
या सोडतीनंतर अनेक गावांत ‘सर्वेसर्वा’ समजल्या जाणाऱ्या चेहऱ्यांची समीकरणे बदलू शकतात. आरक्षणाचा फटका बसून काही दिग्गजांना निवडणूक रिंगणाबाहेर जावे लागू शकते, तर काही नव्या चेहऱ्यांना राजकारणात प्रवेश मिळण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
गावपातळीवर या सोडतीमुळे कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून, सरपंचपदाच्या राजकीय लढतीत कोणता गट वरचढ राहणार, कोणता गट नाराज होणार आणि कोणते नवे राजकीय समीकरण तयार होणार – यावर तालुक्याचे पुढील राजकारण ठरणार आहे.
एकूणच, २५ एप्रिल हा दिवस जावली तालुक्यातील राजकीय भवितव्याला कलाटणी देणारा ठरणार, हे निश्चित!